रत्नागिरी : महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी पसंतीचं ठिकाण असलेलं सुप्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरही आजपासून सुरु झालं आहे. सरकारने घालून दिलेल्या अटीशर्थींप्रमाणे भाविकांसाठी गणपतीचं दर्शन सुरु करण्यात आलं आहे. आज पहाटे 5 वाजता गणपतीपुळ्यातील मंदिर उघडण्यात आलं.
ग्रामस्थ आणि राज्यभरातून दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा थेट संपर्क होऊ नये, यासाठी मंदिर समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यात पहाटे 5.30 ते सकाळी 7.30 पर्यंत स्थानिकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत बाहेर गावावरुन आलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत मंदिर परिसर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यावेळेत मंदिर परिसरात निर्जंतुकीकरणाचं काम होईल. त्यानंतर दुपारी 2 वाजता मंदिर सुरु करुन संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मंदिर सुरु राहणार आहे. गणपतीच्या दर्शनासाठी येताना दुर्वा, फुले, आदी ओलं साहित्य न आणता नारळ, सुका मेवा असा प्रसाद बंद पिशवीमध्ये पॅक करुन आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर मंदिरात कुठल्याची प्रकारची पूजा, अभिषेक करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच मंदिरात प्रवेश करताना मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. दोन भाविकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून रांगा लावल्या जाणार आहेत. 10 वर्षाखालील मुले आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, दीर्घकालीन आजारी व्यक्ती यांनी मंदिरात येऊ नये असं आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आलं आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:49 PM 16-Nov-20