रत्नागिरी : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन नागरिकांनी करणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळात गेले अनेक दिवस नागरिक घरामध्ये होते परंतु घराबाहेर पडताना स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले. आज दापोली उपजिल्हा रुग्णालयास दिलेल्या भेटीदरम्याने आढावा बैठक तसेच पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, माजी आमदार संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. टोपे म्हणाले, दररोज जनतेशी अधिक प्रमाणात संपर्क असणाऱ्या ठिकाणी काम करणाऱ्या नागरिकांनी आर्वजून केारोनाची टेस्ट करुन घ्यावी. मास्कचा वापर करुन सोशल डिस्टसिंग पाळावे जेणेकरुन कोरोनापासून स्वत:चा बचाव होईल व इतरांनाही धोका पोहोचणार नाही असेही त्यांनी सांगितले. श्री. टोपे म्हणाले, राज्यातील रुग्णालयांचा दर्जावाढ करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत दापोली उपजिल्हा रुग्णालयातील प्रसुती तसेच इतर सुविधा मोफत करण्यात येतील. सद्यस्थितीत जिल्ह्यातील नादुरुस्त रुग्णवाहिका निर्लेखित करण्यात आल्या असून जिल्ह्यात नवीन रुग्णवाहिका लवकरच उपलब्ध करुन देण्यात येतील. शासकीय आरोग्य रुग्णालयातील रिक्त जागांचा प्रश्न सोडविण्यासाठी चक्राकार पध्दतीमध्ये कर्मचारी व डॉक्टर यांची नियुक्ती करताना कोकणाला प्राधान्य द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली आहे अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात पाच तालुक्यांच्या केंद्रस्थानी खेड तालुक्यातील कळंबणी येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ब्लड बँक सुरू करण्यात येईल तसेच दापोलीला समुद्रकिनारी अपघात होतात पर्यटनाच्या दृष्टीकोनातून मोबाईल ॲम्बुलन्स आवश्यक असल्याने ती उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.यावेळी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
4:20 PM 20-Nov-20