रत्नागिरी : सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर जैविक शेती मिशन राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जैविक शेती उत्पादनाचे प्रमाणीकरण कृषी विभागातर्फे करण्यात येणार आहे. जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनेत ५ हजार हेक्टरवर प्रत्येकी १० गावांचे जैविक शेती समूह गट तयार करण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे १२ हजार शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे. शेतकऱ्यांना लागवडीपासून, पॅकेजिंग, विपणन यांचे प्रशिक्षण देऊन शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर किमान ३ वर्षे शेतकऱ्यांना याबाबत सहकार्य व मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जैविक शेतीचे प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. याबाबतचा आरखडा तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी प्रत्येक ताक्यातील एका गावात सुरू करण्यात आल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांनी सांगितले.
