रत्नागिरी : जप सरकाराने महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत केलेल्या विविध प्रकारच्या विकासकामांची माहिती घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाजनादेश यात्रा घेऊन रत्नागिरीत येत आहेत. मंगळवार १७ रोजी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भव्यदिव्य स्वरूपाची सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यकत्यांना काय मंत्र देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कार्यकत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सभेनंतर मुख्यमंत्र्यांचा मुक्काम रत्नागिरीत असून १८ ला सकाळी पत्रकार परिषदेनंतर ते महाजनादेशयात्रा घेऊन नाशिककडे प्रयाण करणार आहेत. कोकणच्या विकासाच्यादृष्टीने मुख्यमंत्री काय बोलतात याकडेही साऱ्या कोकणवासीवांचे लक्ष लागून राहिले आहे. १७ सप्टेंबरला दुपारी कणकवलीत महाजनादेश यात्रेतील सभा झाल्यानंतर मुख्यमंत्री राजापूरमार्गे आडिवरे, पावस येथून सायंकाळी रत्नागिरीत पोहोचतील, जयस्तंभ येथे यात्रेचे जल्लोषी स्वागत केले जाणार असून ढोल-ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत होईल. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सायंकाळी साडेपाच वाजता सभा सुरू होणार आहे. यात्रेमध्ये मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विनोद तावडे, आशिष शेलार, गिरीष महाजन, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आणि सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी सहभागी होणार आहेत. यात्रेची जय्यत तयारी सुरू असून शहरात विविध ठिकाणी फलक प्रदर्शित झाले आहेत. जागोजागी स्वागताचे फलक व भाजपचे झेंडे सर्वत्र पाहायला मिळत आहेत. मंडप उभारणी पूर्ण झाली आहे, आज दुपारी व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू होते. हा भव्य मंडप नागपूरच्या ठेकेदाराने उभारला असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही चोख ठेवला आहे. मारुती मंदिर येथे शिवाजी स्टेडियमकडे जाणाऱ्या नाक्यावरील दुभाजक खुले करण्यात आले. मार्गातील अडथळे, खड़े दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते, महावितरण व पालिका प्रशासनाने या दौऱ्यासाठी पुरेशी काळजी घेतली आहे.
