नवी दिल्ली : लोकसभेत आज (ता.२४) ‘बेकायदा कृत्यरोधी दुरुस्ती विधेयक २०१९’ (यूएपीए विधेयक) मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने २८८ तर, विरोधात ८ मते पडली. दरम्यान सभागृहात या विधेयकावर जोरदार चर्चा झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाना साधत, १९६७ मध्ये इंदिरा गांधी यांनीच हे विधेयक आणले होते, अशी माहिती दिली. शहा पुढे म्हणाले की, या विधेयकानुसार दहशतवादी कारवायांमध्ये भाग घेणाऱ्या आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना दहशतवादी घोषित करण्यात येणार आहे. एखाद्याकडे बंदूक असली म्हणजे तो दहशतवादी होत नाही, तर त्याच्या डोक्यात दहशतवादी विचार असतात म्हणूनच तो दहशतवादी बनतो, असेही त्यांनी सांगितले. दहशतवाद वाढविण्यासाठी रसद पुरविणाऱ्यांना, तसेच आर्थिक पाठबळ देणाऱ्यांना, दहशतवादी साहित्याचा प्रचार-प्रसार करून तरुणांच्या मनात दहशतवाद रुजविणाऱ्यांना दहशतवादी म्हणायचे की नाही? असा प्रश्न अमित शहा यांनी यावेळी उपस्थित करत विरोधकांवर हल्लाबोल केला.
