मुंबई : राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात येणारे पहिले ‘लोकशाही पुरस्कारांची’ आज घोषणा करण्यात आली. ही घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज मुंबई येथे केली. हे पुरस्कार उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता. २७) वितरण करण्यात येणार आहेत. यावेळी सहारिया यांनी सांगितले की, मुंबईतील हॉटेल आयटीसी मराठामध्ये २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता आयोजित पुरस्कार प्रदान समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सन २०१६ आणि २०१७ या कालावधीत पार पडलेल्या नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांदरम्यान नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतल्याबद्दल विविध संस्था आणि व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी वेगवेगळ्या सहा गटात एकूण १४ पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
