युतीबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त तीन लोकांनाच

0

मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. मात्र अद्यापही युतीचा जागावाटपाचा गोंधळ सुरू आहे. सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीपासून आमचे ठरलंय असे म्हणणाऱ्या शिवसेना-भाजपा युतीचे घोडे जागावाटपात अडले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना १४४ जागा न मिळाल्यास युती तुटण्याची शक्यता शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वर्तवली. त्यांच्या वक्तव्यावार पलटवार करत भाजप नेते गिरीश महाजन यांनी युतीबद्दल बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही, अशा शब्दांत ठणकावले. गिरीश महाजन यांनी रावते यांनी जागावाटपावरून केलेल्या दाव्यात काही एक तथ्य नसल्याचे सांगितले आहे. “युतीच्या जागावाटपाचा प्रश्न वरिष्ठ पातळीवरील आहे. त्याबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त तीन लोकांनाच आहे. असे त्यांनी रावते यांना अप्रत्यक्षपणे ठणकावले.  तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीन व्यक्तीनांच युतीबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. युती होणार आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांत जागावाटपाचा तिढा सुटेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करताना भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत नाणारचा प्रकल्प इतरत्र हलवण्याचे तसेच विधानसभेला शिवसेनेला १४४ म्हणजेच निम्म्या (२८८पैकी१४४) जागा देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. त्यानुसार  शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे रावते यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here