देवरूख : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा स्वच्छता अभियानाची हाक दिली आहे. ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर या कालावधीत देवरूख नगरपंचायत ‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान राबवणार आहे. २ ऑक्टोबरला देवरूख शहरात सर्व नागरिकांना सोबत घेऊन महाश्रमदान अभियान राबवले जाणार आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये यांनी दिली. शासन निर्णयाप्रमाणे देवरूख शहरात ही मोहीम राबवलीजाणार आहे. शाळा-शाळांतून महाविद्यालयातून विविध स्पर्धा होणार आहेत. दोन तारखेला देवरूख शहरातील सर्व प्रभागात महाश्रमदान होणार आहे. यावेळी कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करून रिसायकलिंग केले जाणार आहे. प्रभातफेऱ्या काढून जनजागृती केली जाणार आहे. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा होणार आहेत.पंधरा शाळांचे पथनाट्य बसवले जाणार आहे. यातून विजेते ठरवले जाणार आहेत. चौदाव्या वित्त आयोगातील तरतुदीनुसार शहरातील वाड्या, वस्त्या, नगरे यामध्ये स्वच्छ परिसर स्पर्धा घेऊन बक्षिसे दिली जाणार आहेत. यामध्ये शासनाच्या धोरणानुसार नियमावली असणार आहे. देवरूखच्या मुख्याधिकारी प्रियांका रजपूत, नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये व सर्व नगरसेवक यांनी जनजागृती सुरू केली आहे. सोळजाई देवस्थानच्या माध्यमातून वाडीनिहाय ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या जाणार आहेत. या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन सुशांत मुळ्ये यांनी केले आहे.
