मंडणगड : ‘सबका साथ सबका विकास’ अशी घोषणा करणार्या राज्य शासनाच्या पाच वर्षांच्या कालावधीत सोळा हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत तर 1 लाख 20 हजार उद्योग बंद पडल्यानंतरही विकासाची वल्गना करणार्या शासनाला जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते व खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने मंडणगडमध्ये आले असताना शहरातील नगर पंचायत व्यापारी संकुलात आयोजीत सभेत ते बोलत होते. शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेत आदीत्य ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेताना ते म्हणाले की, प्रदूषणमुक्त महाराष्ट्र घडवायचाच असे सांगणार्या सेनेकडेच पाच वर्षे पर्यावण खाते होते. मग महाराष्ट्र प्रदुषणमुक्त का झाला नाही ? तसेच बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र घडवायचा असे सांगणार्याकडे पाच वर्षे उद्योगखाते होते. मग या समस्या का सोडवल्या नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील शेतकरी काद्यांला भाव मिळावा यासाठी संघर्ष करीत असताना पाकिस्तानातून कांदा आयात करण्याचे पाप भाजपने केले आहे. आगामी विधानसभा निवडणूक ही राज्याचे भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. त्यामुळे 370 कलम रद्द केल्याचा संदेश आल्यास बेरोजगारीचे काय झाले असा प्रतिप्रश्न विचारा. काश्मीरविषयी संदेश आला तर शेतकर्यांचे काय झाले असा प्रतिप्रश्नाचा संदेश पाठवा, असे कोल्हे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, आ. संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, प्रकाश शिगवण, अनिल रटाटे, वैभव कोकाटे, राहूल कोकाटे, सुभाष सापटे, नितीन म्हामुणकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे 20 सप्टेंबर रोजी तालुक्यातील बाणकोट येथे आगमन झाले. यावेळी नवनिर्वाचित खा. डॉ.अमोल कोल्हे, खा. सुनील तटकरे, अमोल मिटकरी, आ. संजय कदम, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हा अध्यक्ष बाबाजी जाधव, विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देव्हारे येथे देव्हारे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उभे राहून डॉ. अमोल कोल्हे यांचे भव्य स्वागत केले. यावेळी डॉ. कोल्हे यांनी शालेय विद्यार्थ्यांसमेवत फोटो काढले. शहरातील दापोली फाटा, पोलिस चेक पोस्ट येथे शहरातील राजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व शहरातील नागरीकांनी फटाके वाजवून यात्रेचे स्वागत केले. यात्रेदरम्यान बाणकोट किल्ल्यावर मनसे तालुकाध्यक्ष महेश कंचावडे व पदाधिकारी यांनी अमोल कोल्हे यांना तलवार भेट देऊन त्यांचे स्वागत केले.
