रत्नागिरी : श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस आणि येथील सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रीमत संजीवनी गाथा’ राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रत्नागिरीतून तन्वी मंगेश मोरे (रत्नागिरी) आणि सिंधुदुर्गमधून महेंद्र मराठे (मालवण) यांनी प्रथम क्रमांक पटकावले. स्पर्धेची अंतिम फेरी लवकरच होणार आहे. श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्सतर्फे दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे ऑनलाइन स्वरूपात स्पर्धा घेण्यात आली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, मुंबई आणि कोल्हापूर आदी विभांगातून प्राथमिक फेर्या पार पडल्या. सर्वच विभागांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रत्नागिरी व सिंधुदुर्ग विभागाचा सविस्तर निकाल असा: रत्नागिरी विभाग ः प्रथम- तन्वी मोरे, द्वितीय (विभागून)- श्रीधर पाटणकर, मयुरेश जायदे (दोघेही रा. रत्नागिरी), तृतीय- वैभव सोमण (दापोली), उत्तेजनार्थ- सुधीर देवस्थळी (चिपळूण) व लीना खामकर (रत्नागिरी); सिंधुदुर्ग विभाग: प्रथम- महेंद्र मराठे, द्वितीय- एकता खानोलकर (दोन्ही रा. मालवण). स्पर्धाप्रमुख म्हणून सेवा मंडळाचे विश्वस्त हेमंत गोडबोले यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्वरूपानंद समाधी मंदिर प्रमुख जयंतराव देसाई, कार्याध्यक्ष विजयराव देसाई, कार्यवाह हृषीकेश पटवर्धन, सप्तसूर म्युझिकल्सचे निरंजन गोडबोले, निखिल रानडे, संतोष आठवले यांनी परिश्रम घेतले. दोन्ही विभागांतील स्वतंत्र विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येतील. स्पर्धेची सर्व विभागांमधून निवडलेल्या पहिल्या तीन क्रमांकांची अंतिम फेरी होऊन लवकरच त्याचा निकाल जाहीर होईल, असे मंडळाने कळवले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:43 PM 22-Dec-20