पुणे : मराठा आरक्षणावरुन भाजपा खासदार संभाजीराजे यांनी ठाकरे सरकारला आता इशारा दिला आहे. जर आर्थिक मागास वर्गाच्या आरक्षणामुळे मराठा आरक्षणाला धक्का लागल्यास त्याला पूर्णपणे राज्य शासन जबाबदार असेल असं त्यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणावर २५ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. EWS आरक्षणाला माझा विरोध नाही, पण याचा धोका एसईबीसी ला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवालही संभाजीराजे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संभाजीराजे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही उल्लेख केला होता. सारथी संस्था जर वाचवायची असेल तर शरद पवारांनी मध्यस्थी करायला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.’मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना सारथीची कल्पना दिली आहे. सविस्तपणे त्यांना हा विषय सांगितला आहे. शरद पवारांच्या वाढदिवशी शुभेच्छा देताना त्यांनाही सांगितलं. आज मी पुन्हा त्यांना सांगू इच्छितो.शरद पवारसाहेब छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक आहेत. त्यामुळे सारथी संस्था वाचवायची असेल तर त्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. लक्ष घातलं पाहिजे’. ‘पुरोगामी आणि शाहू महाराजांचे विचार जर जिवंत ठेवायचे असतील तर लक्ष घालणं गरजेचं आहे. अन्यथा गुंडाळून ही संस्था बंद करावी. उगाच शाहू महाराजांच्या नावे संस्था उभी करायची. बुडीत घालायचीच असेल तर बंदच करुन टाका. कशाला आपण शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घ्यायचं,’ असा संतापही यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता शरद पवार यात लक्ष देणार का? संभाजराजेंची मागणी मान्य होणार का? हे पाहणेही महत्वाचे असणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:19 PM 24-Dec-20