…मग हे तर मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हणतील : राहुल गांधी

0

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचं समर्थन करत आज राजधानी दिल्लीत काँग्रेसकडून राष्ट्रपती भवनाकडे एक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पोलिसांनी मध्येच अडवला. सामूहिक मोर्चा रोखल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद आणि अधीर रंजन यांच्यासोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन एक निवेदन सोपवलं. कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचाही या निवेदनात समावेश करण्यात आला होता. यानंतर मीडियाशी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले. ‘जो कोणी यांच्या विरोधात उभं राहण्याचा प्रयत्न करेल त्याला दहशतवादी म्हटलं जाईल, मग ते राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत का असेनात’ असं म्हणतानाच राहुल गांधी यांनी एकाच वेळी दोन निशाणे साधलेत.

आम्ही तीन लोक राष्ट्रपतींकडे गेलो. कोट्यवधी शेतकर्‍यांच्या सह्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचलो. आम्ही शेतकऱ्यांचा आवाज राष्ट्रपतींकडे पोहचवण्याचा प्रयत्न केला. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि शेतकरी व्यथित, वेदनेत आहे आणि तीळतीळ तुटतोय, हे अवघा देश पाहत आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या. पंतप्रधानांना ऐकावं लागेल. मी अगोदरच सांगतो, करोनाच्या वेळीही सांगितलं होतं की नुकसान होणार आहे. आज मी पुन्हा सांगतोय की शेतकरी आणि मजूर यांच्यापुढे कोणतीही ताकद टिकू शकणार नाही. यामुळे भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नाही तर देशाला नुकसान होणार आहे. हा शेतकरीविरोधी कायदा आहे. यामुळे शेतकरी आणि मजुरांचं मोठं नुकसान होणार आहे. हा कायदा शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचं सरकारनं वारंवार सांगितलं परंतु, तेच शेतकरी आज या कायद्याच्या विरोधात उभे आहेत, असंही त्यांनी म्हटलं.शेतकरी आणि मजूर त्रासून घरी निघून जातील, असा विचार सरकारनं करू नये. जोपर्यंत हे कायदे मागे घेतले जाणार नाहीत तोवपर्यंत ते मागे हटणार नाहीत. संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलावून हे कायदा मागे घ्यावेत. आम्ही शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे आहोत, असं यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलंय. आपण लोकशाहीत राहत आहोत आणि हे निवडून आलेले खासदार आहेत. त्यांना राष्ट्रपतींची भेट घेण्याचा अधिकार आहे, त्यासाठी त्यांना परवानगी मिळायला हवी. सरकारला नेमकी काय अडचण आहे? दिल्लीच्या सीमेवर उभ्या असलेल्या कोट्यवधी शेतकर्‍यांचा आवाज सरकारपर्यंत का पोहचत नाही. शेतकर्‍यांसाठी ज्या शब्दांचा वापर करण्यात आला ते ‘पाप’ आहे. जर सरकार त्यांना ‘देशद्रोही’ म्हणत असेल तर सरकार ‘पापी’ आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटलंय. पंतप्रधान भांडवलदारांसाठी पैसे उभे करत आहेत. जो कुणी यांच्या विरोधात उभं राहण्याचा प्रयत्न करेल त्याला ‘दहशतवादी’ म्हटलं जाईल – मग ते शेतकरी असोत, कामगार असोत किंवा मग ते मोहन भागवत का असेनात, असं म्हणत राहुल गांधींनी एका वारात दोन निशाणे साधलेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:42 PM 24-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here