राजापूर : राजापूर तालुका कृषी विभागातर्फे नाटे येथे आज कृषी मेळावा आयोजित करण्यात आला होता. शेतीमध्ये अर्थार्जनाची मोठी संधी आहे. त्यामुळे विकेल ते पिकेल या धोरणानुसार शेतकरी आणि बचत गटांनी विविध पिके घेऊन उपलब्ध होणाऱ्या संधींचे सोने करावे, असे आवाहन राजापूर तालुका कृषी अधिकारी विद्या पाटील यांनी शेतकरी मेळाव्यात केले. मेळाव्याला नाटे गावच्या सरपंच योगिता बांदकर, एम. एच. महाले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या. श्रीमती पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सेंद्रिय शेतीसह अन्य शेतीविषयक सविस्तर माहिती देऊन शंकांचे निरसन केले. कोणतेही पीक घेताना मातीपरीक्षण करणे का महत्त्वाचे आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देताना आधुनिकतेची कास धरण्याचे आवाहनही त्यांनी केले. जमिनीचा पोत आणि आरोग्य टिकविण्याचे महत्त्व, मातीपरीक्षण, मृदा नमुने काढण्याच्या पद्धती, सुपीकता निर्देशांकावरून खत मात्रा कशी द्यावी आदींविषयी एम. एच. महाले यांनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:58 PM 24-Dec-20