रत्नागिरी : महाराष्ट्र सागरी अधिनियमातील अधिसूचनेनुसार येत्या १ जानेवारीपासून ३१ मेपर्यंत पर्ससीन मासेमारीसाठी बंदी करण्यात आली आहे. तसेच १ जून ते ३१ जुलै हा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी आहे. ही माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त ना. वि. भादुले यांनी दिली. याबाबतच्या अधिसूचनेची प्रत मच्छीमारी सहकारी संस्थेला देण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत यांत्रिक पद्धतीने मासेमारीला पूर्णत: बंदी करण्यात आली आहे पर्ससीन जाळ्याने मासेमारी करताना नौका आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नौका मूळ बंदरात किंवा अंमलबाजवणी अधिकारी विहित करतील, अशा बंदरात अवरुद्ध करून ठेवण्यात येईल. त्याबाबत अभिनिर्णय अधिकारी यांच्याकडे दावा दाखल करण्यात येईल. या दाव्याचा निर्णय लागेपर्यंत नौका विभागाच्या ताब्यात असेल, तथापि नौकेच्या संरक्षणाची जबाबदारी संपूर्णपणे मालकांची राहील. मासेमारीस मात्र जाता येणार नाही. नौका ज्या बंदरात अवरुद्ध करून ठेवलेली असेल, तेथे ती पुढील आदेशापर्यंत आढळली नाही, तर नौका मालकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. संबंधित नौकेचा परवाना आणि नौकेची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे, असेही आदेशात म्हटले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:45 AM 31-Dec-20