”…तर महाराष्ट्राचंच नाव बदला”

0

मुंबई : ‘औरंगाबादला एक इतिहास आहे. तो इतिहास पुसून औरंगाबादचं नाव बदलणं योग्य नाही. त्यामुळं विकास होणार नाही. बदलायचंच असेल तर आधी महाराष्ट्राचं नाव बदला,’ असं आवाहन समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या भलताच गाजत आहे. या मुद्द्यावरून राजकीय पक्षांमध्ये दोन गट पडले आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षानं नामांतराला स्पष्ट विरोध केला आहे. तर, एनडीएतील रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षानंही तीच भूमिका घेतली आहे. आता महाविकास आघाडीच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षानंही नामांतर योग्य नसल्याचं म्हटलं आहे.

सपाचे नेते अबू आझमी यांनी एका व्हिडिओद्वारे उद्धव ठाकरे यांना एक विनंती केली आहे. ‘शहरांची नावं बदलून कुणाचं पोट भरत नाही. शहरांना आवडीचं नाव ठेवायचंच असेल नवं शहर वसवून ठेवा. अहमदनगर किंवा औरंगाबादला एक इतिहास आहे. तो बदलून जबरदस्तीनं नामांतर योग्य नाही. नामांतर करायचंच असेल तर आधी महाराष्ट्र राज्याचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या. रायगडचं नाव बदलून संभाजी महाराजांचं नाव द्या. लोकांनाही ते आवडेल. मात्र, केवळ काही लोकांना डिवचण्यासाठी नामांतर करणं हे आपल्याला शोभत नाही,’ असं आझमी यांनी म्हटलं आहे. ‘महाराष्ट्रात देशभरातून, जगभरातून लोक येत असतात. तुम्ही राज्याला पुढं घेऊन जा. विकास करा. नवे जिल्हे निर्माण करा. लोक नक्कीच तुमचं कौतुक करतील. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचं काम करू नका. ते आपल्यासारख्याला शोभत नाही,’ असं आझमी यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:55 AM 04-Jan-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here