देवरूख : लोकशाहीचा उत्सव सुरू झाला असून विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकशाहीचा उत्सव दहशत मुक्त वातावरणात पार पडावा, यासाठी राजकीय गुंडगिरी करणाऱ्यांना जिल्हा बंदी करावी, अशी मागणी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्हा हा शहरी, निमशहरी आणि ग्रामीण आहे. या निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यात बड्या राजकीय पक्षांसोबतच सामान्य उमेदवार, मतदार यांना त्यांचे मत मोकळे पणाने मांडता आले पाहिजे. काही समाजकंठक लोकांकडून दुर्बल नागरिकांवर मते लादण्याचा प्रकार या निवडणूक दरम्यान होऊ शकतो. मागील अनेक निवडणुकांत असे प्रकार घडल्याची उदाहरणे कोकणात आहेत. कोकणातील निवडणुका या राज्यात आदर्श व्हायला हव्यात ही आमची भूमिका आहे, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. जिल्ह्यातील नेहमी वादग्रस्त ठरलेले, राजकीय गटबाजीतून नागरिकांना वेठीस धरणारे, सराईत राजकीय गुन्हेगार जे जिल्हा पोलिस रेकॉर्डवर आहेत किंवा स्थानिक पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवर आहेत, अशांना या निवडणुकीत जिल्हाबंदी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी सुहास खंडागळे यांनी केली आहे. प्रचारा दरम्यान कोणत्याही संघटनेच्या व्यक्तीने दहशत, किरकोळ मारामाऱ्या केल्या तरीही अशालोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खंडागळे यांनी केली आहे. आपण जिल्हा यंत्रणा म्हणून ही दक्षता घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.