दापोली : वादळी वातावरणामुळे व सुरक्षितेच्या कारणास्तव रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ बंदरात उभ्या असलेल्या चीनी नौका आता परतीच्या मार्गावर आहेत. एकूण आठ चिनी नौकांनी दाभोळ बंदर सोडले आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगाला चीनचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगत असतानाच देशाच्या अरबी समुद्र किनाऱ्यावर मात्र या नौका अनेक दिवस तळ ठोकून होत्या. त्यामुळे सागरी सीमा सुरक्षिततेसंदर्भात कोणती खबरदारी घेण्यात आली या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला काही चिनी नौका वादळी वातावरणामुळे दाभोळ बंदरात दाखल झाल्या होत्या. आजपर्यंतयानोकाबंदरात उभ्याहोत्या. यावर वेगवेगळ्या देशांतील खलाशी असल्याने त्याविषयी जोरदार चर्चा सुरू होती. मध्यंतरी या नौकांवरील खलाशांमध्ये हाणामारीही झाली होती. भाषेच्या अडचणीमुळे प्रशासन, पोलिस यंत्रणेला देखील त्यांच्याशी संवाद साधणे अडचणीचे ठरत होते. एकूण दहा मासेमारी नौका या बंदरात उभ्या होत्या. त्यापैकी आठ नौकांनी आता बंदर सोडले आहे. अजूनही दोन नौका बंदरातच उभ्या आहेत. या बाबत शासनाने कोणती दखल घेतली या संदर्भात स्थानिकांकडून विचारणा होत आहे.