मुंबई : ‘ज्या चालकांची 25 वर्षे विना अपघात सेवा झाली आहे, अशा चालकांना यापुढे राज्य स्तरावर सत्कार करून, 25 हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात येईल’, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली. चुकलेल्या चालकांना ज्याप्रमाणे आपण शिक्षा करतो त्याचप्रमाणे चांगले काम करणाऱ्यांचेही आपण कौतुक करायला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. सुरक्षित प्रवास हेच प्रमुख ध्येय असलेल्या एसटी महामंडळाकडून 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 दरम्यान रस्ते सुरक्षितता मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन सोमवारी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल आगार येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळात गेली 25 वर्षाहून अधिक काळ विना अपघात सेवा देणारे भारत कोल्हे, कीर्ती कुमार पाटील, परशुराम बंडेकर, सुदेश समुद्रे, महादेव जगधने या मुंबई विभागातील 5 चालकांचा मंत्री परब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृती चिन्ह देऊन प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:48 PM 19-Jan-21