मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेच्या ग्राहकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलासा दिला आहे. पीएमसी बँकेचे ग्राहकांना 6 महिन्यांतून 10 हजार रुपयांपर्यंत पैसे काढता येणार आहेत. आरबीआयच्या आदेशानंतर पीएमसी बँकेने ग्राहकांची त्यांच्या खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा वाढवली आहे. त्याआधी ही मर्यादा केवळ एक हजार रुपयांची होती. आरबीआयच्या बॅकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९च्या सेक्शन ३५ अ अंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली आहे. पीएमसी बँकेने सहा महिन्यातून केवळ एक हजार रुपये काढता येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण होते. त्यामुळे ग्राहकांनी आंदोलने-निदर्शनेही केली. ग्राहकांच्या वाढत्या रोषामुळे पीएमसीला माघार घ्यावी लागली. त्यानंतर बँकेने ग्राहकांना बँक खात्यातून काढावयाच्या रकमेत वाढ केली आहे. सहा महिन्यातून एकदा एक हजाराऐवजी दहा हजार रुपये काढण्याची मुभा पीएमसी बँकेने ग्राहकांना दिली असली तरी बँकेच्या या निर्णयावरही ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. आमचे पैसे बँकेतून काढण्यावर आम्हालाच का मनाई करण्यात येत आहे? दहा हजारात सहा महिने घरखर्च कसा भागवायचा असा सवाल ग्राहक उपस्थित करत आहेत.
