मुंबई : राज्यात नोकर भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आरोग्य खात्याने आणि गृह खात्याने त्या संबंधी आदेश जारी केले असून नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण शासनाच्या या निर्णयावर मराठा नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने नुकतेच 8500 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे तर गृह विभागाने सुद्धा पहिल्या टप्प्यात 5,297 पोलीस शिपाई पदांसाठीच्या जाहिरातीसाठी प्रशासकीय मान्यता जारी केली आहे. आरोग्य आणि गृहखाते या दोन्ही विभागाचे मिळून पहिल्या टप्प्यात 13,800 पदे भरण्यात येणार आहेत. आता या भरती प्रक्रियेला मराठा नेत्यांनी विरोध केल्याचं पहायला मिळतंय.
सरकारने सुरु केलेल्या या भरतीवर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे म्हणाले की, “ही भरती रद्द करा अशी मराठा समाजाची भूमिका नाही तर केवळ एखादा महिना ती पुढे ढकलावी अशी मागणी आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करुन सरकारने ही भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतलाय. हे सरकार सत्तेचा अंदाधूंद वापर करत आहे. मराठा समाजाविरोधी या सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत हे निश्चित.”
विनायक मेटे म्हणाले की, “मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालावे आणि ही प्रक्रिया थोडी पुढे ढकलावी. त्यामुळे सर्वांच्या सोबत मराठा समाजालाही न्याय मिळेल. जर ही भरती प्रक्रिया सरकारने सुरु ठेवली तर त्या विरोधात काय भूमिका घ्यायची हे मराठा समाजातील नेते एकत्र बसून घेतील.”
मराठा समाजाचे नेते विनोद पाटील म्हणाले की, “मराठा समाजातील विद्यार्थी दुहेरी संकंटात सापडला आहे. एकीकडे वय निघून जात आहे तर दुसरीकडे भरती होणं गरजेचं आहे. अनेक विद्यार्थी बरेच वर्षापासून तयारी करतात. राज्य सरकारने ही भरती करत असताना मराठा समाजासाठी विशेष बाब आणि मॅनेजमेन्ट कोटा ही पद्धत राबवावी. मराठा विद्यार्थ्यांना डावलून ही भरती करणे योग्य नाही. सरकारने यामधून मार्ग काढावा आणि मराठा विद्यार्थ्यांना या भरतीत कसे समाविष्ट करता येईल हे पहावं.”
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:22 PM 23-Jan-21