मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात किसान सभेनं मोर्चाचं आयोजन केलं आहे. नाशिकहून आलेला मोर्चा सध्या आझाद मैदानात असून थोड्याच वेळात तो राजभवनावर धडकणार आहे. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या आंदोलनात सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनात सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता ही शक्यता धूसर झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकरी मोर्चात सहभागी होऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे. उद्धव ठाकरे घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा निघू नये, अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मोर्चात सहभागी होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. मात्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे इतर नेते आणि मंत्री या मोर्चात सहभागी होतील.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:06 AM 25-Jan-21