रत्नागिरी : मित्रपक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेते यांच्या संदर्भाने टीका टाळावी, भाजपच्या सर्व नेत्यांचा मान राखला जावा. तसेच मुख्यमंत्र्यांविरोधातील टीका ही भाजप कार्यकर्त्यांना जिव्हारी लागली आहे, हे असेच सुरू राहिल्यास युतीत ताळमेळ राखणे अवघड जाईल, याची नोंद मित्रपक्षाने घ्यावी. यासाठी शिवसेना नेत्यांशी संपर्क साधून त्यांना तसे सांगण्यात यावे, असा निर्णय रत्नागिरीत झालेल्या भाजपच्या बैठकीत घेण्यात आला.
रत्नागिरीत भाजपचे जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, सरचिटणीस यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले. भाजप संघटनेचे काम आणि निवडणूक याची सांगड घालत प्रत्येक तालुक्याने आपली निवडणूक यंत्रणा सज्ज करावी, असे पटवर्धन म्हणाले. विधानसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वाला अपेक्षित काम सर्वांनी करावे, असे आवाहन केले.