मुंबई : 15 फेब्रुवारीपासून राज्यात विद्यापीठे व कॉलेज सुरू होणार असून मुंबई व परिसरातील वर्ग सुरू करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकाचा बुक्टो प्राध्यापक संघटनेने विरोध केला आहे. या परिपत्रकात वर्ग सुरू करण्यासाठी प्रत्येक कॉलेजने स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घ्यावी असे म्हटले आहे. बुक्टोचा याला विरोध असून स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेण्याचे काम मुंबई विद्यापीठाचे आहे असे म्हटले आहे. तसेच या परिपत्रकाविरोधात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रारही करण्यात आली आहे.
3 फेब्रुवारी रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कॉलेज सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना विभागाने प्रत्येक विद्यापीठाने स्थानिक आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा स्थानिक प्रशासनशी विचारविनिमय करून त्या भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून सर्वांच्या सहमतीने कॉलेज सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते. मात्र मुंबई विद्यापीठाने हे निर्देश डावलून प्रशासनाची परवानगी घेण्याची जबाबदारी कॉलेज, शैक्षणिक संस्थांवर सोडली आहे. याबाबत बुक्टोने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवून यामध्ये तातडीने लक्ष घालण्यास सांगितले आहे. 780 कॉलेजनी वेगवेगळ्या परवानग्या घ्यायच्या का? कॉलेज सुरू करताना स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी विचारविनामय करून निर्णय घ्यावा, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. सोबतच यूजीसीने कॉलेज सुरू करण्याबाबत ज्या गाईड लाइन्स दिल्या आहेत त्याचे पालन करून तो अहवाल स्थानिक प्रशासनाला कळवावा, असेही स्पष्ट केले आहे. विद्यापीठाचे हे परिपत्रक शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता आपल्या जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रकार असून विद्यापीठांतर्गत येणाऱया प्रत्येक 780 कॉलेजला स्थानिक प्रशासनाकडून परवानग्या घ्याव्या लागणार का? असा प्रश्न बुक्टोचे प्रा. डॉ. जी. बी. राजे आणि डॉ. मधू परांजपे यांनी केला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:45 PM 09-Feb-21