मुंबई : ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर मायदेशात पहिलीच कसोटी मालिका खेळणाऱ्या टीम इंडियाचे ‘तारे जमी पर!’ आले आहेत. भारतात येण्यापूर्वी श्रीलंका दौऱ्यावर आशिया खंडातील खेळपट्टीचा अभ्यास केलेल्या इंग्लंडच्या संघानं पहिली कसोटी सहज जिंकली. जेम्स अँडरसनच्या एका षटकानं टीम इंडियाला बॅकफूटवर पाठवले. शुबमन गिल व विराट कोहली यांची अर्धशतकी खेळी वगळता भारतासाठी काहीच चांगलं झालं नाही. भारताच्या या दारुण पराभवाला शेतकरी आंदोलनावरुन उठलेल्या आंतरराष्ट्रीय बदनामीच्या कारस्थानशी जोडण्यात आलंय. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन रामजीवि असं म्हटलंय.
इंग्लंडच्या ४२० धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला १९२ धावा करता आल्या. इंग्लंडनं हा सामना २२७ धावांनी जिंकला. ऑस्टेलयाला पराभूत केल्यानंतर मायेदशी जल्लोषात स्वागत झालेल्या टीम इंडियाचा पराभव सर्वांनाचा आश्चर्यकारक आहे. तर, दुसरीकडे दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन अमेरिकन पॉपस्टार रिहाना हिने ट्विट केल्यानंतर देशाभरातील सेलिब्रिटींनी इंडिया टुगेदर ही ट्विट मोहिमच चालवल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज खेळाडूंनीही देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडता जपण्यासाठी ट्विट केलं. त्यावरुन, ट्विटरवर मोठं वादंग उठलं होतं. याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन भाजपा नेत्यांना टोला लगावला आहे. आज इंग्लंडकडून झालेला भारताचा पराभव हा भारतीय क्रिकेटला बदनाम करण्यासाठी शिजत असलेल्या आंतरराष्ट्रीय कटाचा पुरावा आहे, असे ट्विट आव्हाड यांनी केलंय. आव्हाड यांच्या यांच मजेशीर किंवा खोचक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, आपल्या ट्विटमध्ये रामजीवि, असे म्हणत मोदींच्या आंदोलनजीवी या शब्दावरुनही टोमणा मारण्यात आला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
3:50 PM 09-Feb-21