कुडाळ : काँग्रेस पक्षाचे विचार कधीच संपत नाहीत.काही जण काँग्रेस पक्षात आले, मोठे झाले आणि आज ते सोडुन गेले. पण त्यांची काय परिस्थिती आहे, हे आपण सर्वजण पाहतच आहात. असे सांगुन काँग्रेसमधून बाजुला झालेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता त्यांच्यावर काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांनी निशाणा साधला.आपल्या पक्षाकडुन संघटनात्मक कामाबाबत काही चुका झाल्या असतील त्या चुका पक्षाकडुन निश्चितच सुधारल्या जातील. विशेष म्हणजे या विधानसभा निवडणुकीत आपल्या सर्वांना सर्वमान्य असा उमेदवार दिला जाईल असे सांगुन विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत संस्पेन्स कायम ठेवला. काँग्रेस पक्षाचा मेळावा कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे सोमवारी संपन्न झाला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत,नवीनचंद्र बांदिवडेकर,माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, माजी आमदार पुष्पसेन सावंत, प्रकाश जैतापकर, बाळा गावडे, विद्याप्रसाद बांदेकर, तालुकाध्यक्ष आबा मुंज, अँड.दिलिप नार्वेकर, नीता राणे,उल्हास मंचेकर, दादा परब, राजू मसुरकर, देवानंद लूडबे, एम.एम.सावंत, श्रीकृष्ण तळवडेकर, नागेश मोर्ये, इरशाद शेख,कौस्तुब सावंत,मंदार शिरसाट,सर्फराज नाईक आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच काँग्रेस पक्षाचा मेळावा संपन्न झाला. अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षाकडुन जिल्हा काँग्रेस संघटनेकडे वरिष्ठ पातळीवरून कुणीच लक्ष देत नसल्याबाबत तालुका पातळीवरून प्रमुख पदाधिकार्यांनी आपला संताप व्यक्त करत काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांचे लक्ष वेधले. जिल्हाध्यक्ष विकास सावंत म्हणाले की, मला यापुर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अनेक ऑफर दिल्या मात्र मी गेलो नाही. सिंधुदुर्गात तीन पैकी दोन मतदार संघ आपल्या वाट्याला येणार आहेत. एबी फॉर्म आपणचं देणार असल्याचे सांगितले. नविनचंद्र बांदिवडेकर म्हणाले, सिंधुदुर्गातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना आज मेळाव्याच्या निमित्ताने निदर्शनास आल्या. या भावना प्रदेश पातळीवर नेऊन निदान सिंधुदुर्गात एक तरी काँग्रेसचं जिल्हाभवन होण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले.पुष्पसेन सावंत यांनी काँग्रेस पक्षाने वेळीच उमेदवारी जाहीर करावी, असे आवाहन करत नारायण राणे यांनी काँग्रेस संपवल्याची टीका केली. यावेळी साईनाथ चव्हाण,अॅड.दिलिप नार्वेकर, राजु मसुरकर, बाळा गावडे, दादा परब यांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे निवेदन व आभार विजय प्रभु यांनी केले.
