रत्नागिरी : विद्यमान जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी जाहीर केलेल्या नूतन जिल्हाध्यक्षांच्या नावावरून बीजेपी कार्यालयात आज धुमशान झाले. आजवर कधीही फारशी बाहेर न आलेली बीजेपी मधील अंतर्गत धुसफूस व गटातटाचे राजकारण आज उफाळून आले. जिल्हाध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन यांनी सुशांत चवंडे यांची तालुकाध्यक्ष पदी नेमणूक केल्याचे जाहीर करताच बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्षांच्या अनुपस्थितीत बीजेपीच्या जिल्हा कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला बाळ माने, सतीश शेवडे, अशोक मयेकर, दादा दळी यांचे समवेत सुमारे २०० कार्यकर्ते उपस्थित होते. काही वर्षांपूर्वी दादा दळी यांना तालुकाध्यक्ष पद दिले जाईल असे कोअर कमिटीने आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाचा विसर पडून जिल्हाध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेताच सुशांत चवंडे यांची नियुकी केली असा आरोप सभेत करण्यात आला. जिल्हाध्यक्षांच्या या वागणुकीवरून जिल्हा कार्यालयात अक्षरशः धुमशान झाले. अॅड दीपक पटवर्धन गटाचे सार्वजन या सभेला अनुपस्थित होते. येत्या काही दिवसात या नाराज कार्यकर्त्यांनी मेळावा घ्यायचे ठरवले असून यामध्ये तालुकाध्यक्षाची निवड जाहीर करायची असे ठरवले आहे.
जिल्हाध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन यांनी जिल्हाध्यक्षपदाची सूत्र आपल्या हाती घेताच संघटनेतील मरगळ दूर केली व संघटनात्मक बदल केले. नुकत्याच मुख्यमंत्र्यांच्या सभेत देखील त्यांची काम करण्याची पद्धत दिसून आल्याने काही जण जाणूनबुजून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत असे बीजेपीचे काही कार्यकर्ते बोलत आहेत.