रत्नागिरी : भाजप सरकार ओबीसी आरक्षण संपूर्णपणे रद्द करण्याच्या तयारीत आहे. नुकताच जी. आर. काढून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ओबीसी आरक्षण फडणवीस सरकारने कमी केले आहे. त्यामुळेच ५२ टक्के ओबीसी बांधवांकडे आता फक्त १० टक्केच आरक्षण राहिलेले आहे. आरक्षण वाचवायचे असेल तर मतदारांनी या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र राज्य देखरेख समितीचे प्रदेश प्रमुख अर्जुन सलगर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सदस्य दीपक मोरे आणि अतुल बहुलेही उपस्थित होते. दीपक मोरे म्हणाले की,भाजपा सरकारने मच्छिमारांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे कानाडोळा केलेला आहे. विमानतळाचा प्रश्न अधांतरीच लटकलेला आहे. तीच गत शेतकऱ्यांची असून आंबा-काजू उत्पादकांना आज मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे वंचित आघाडीच्या उमेदवारास निवडून दिल्यास हे सर्व प्रश्न सोडवले जातील तसेच शेतकऱ्यांना लाभदायक असणाऱ्या प्रकल्पांनाच पाठिंबा दिला जाईल.
