देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेवरुन स्‍वामी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला

0

नवी दिल्‍ली : सत्‍य ऐकण्‍याची तयारी ठेवा आणि  प्रशासनातील अर्थतज्ज्ञांना घाबरवणे बंद करा, अशा शब्‍दात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. यापूर्वी देखील देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेवरुन स्‍वामी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘मोदींच्या कामाची पद्धत पाहता खूपच कमी व्यक्ती त्यांच्यासमोर बोलू शकतात. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींना मनमोकळेपणानं त्यांचे विचार मांडता यावेत यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. मात्र, आजपर्यंत नरेंद्र मोदी यांनी अशी सवय लावून घेतलेली नाही, अशा शब्दांमध्ये  सोमवारी (ता. ३०) एका पुस्‍तक प्रकाशनाच्‍या कार्यक्रमादरम्‍यान स्वामी यांनी मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोदी सरकारनं कॉर्पोरेट करात कपात केली आहे. याशिवाय आणखीही पावले उचलली आहेत. मात्र अद्याप याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसलेले नाहीत. देशातील मंदीला नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर कारणीभूत ठरल्‍याचे सुब्रमण्यम स्वामी म्‍हणाले. रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालय नेमक्या समस्यांवर काम करत नसल्याने अर्थव्यवस्थेसमोरील संकट अधिक वाढत असल्‍याचे त्‍यांच्‍याकडून सांगण्‍यात आले. अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी त्रिस्तरीय प्रयत्नांची आवश्यकता आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी अल्प, मध्यम आणि दीर्घ काळासाठी स्वतंत्र धोरणे आखायला हवीत. मात्र, सध्या अशी कोणतीही धोरणे अस्तित्वात नाहीत. पंतप्रधानांना अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती सांगण्याची हिंमत प्रशासनातील एकही अर्थतज्ज्ञ करत नसेल. कारण, मोदींना सत्य ऐकण्याची सवय नाही, असा टोलाच सुब्रमण्यम स्वामी  यांनी लगावला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here