रत्नागिरी : कलाकार रसिकांची आमने सामने गाठ घालून देणारा आणि त्यांच्यात सहवास-संवाद घडवून आणणारा ‘मुक्तसंध्या’ हा चतुरंगचा लोकप्रिय उपक्रम आहे. या उपक्रमाचा १५० वा कार्यक्रम चतुरंग प्रतिष्ठान कोकणात साकारत आहे. देवरूख आणि रत्नागिरीत हा कार्यक्रम होणार आहे. चतुरंग प्रतिष्ठानच्या रत्नागिरी केंद्राच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्ताने हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी कोकणातील आरवली (ता. संगमेश्वर) येथील लोकप्रिय गायक कलाकार प्रथमेश लघाटे याची मुलाखत यावेळी घेतली जाणार आहे. अलीकडेच घोषित झालेल्या ‘सूर ज्योत्स्ना’ या राष्ट्रीय स्तरावरील संगीत पुरस्काराचा तो मानकरी ठरला आहे. त्याच्या गायन मैफलीऐवजी त्याच्या गप्पागोष्टीमय जाहीर मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. चतुरंग प्रतिष्ठानची एकशे पन्नासावी विशेष मुक्तसंध्या देवरूख येथील अभिरुची संस्थेच्या सहयोगाने देवरूख येथे सायंकाळी ६ वाजता लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालयात साजरी होणार आहे. रत्नागिरीत चतुरंग आपल्या रत्नागिरी केंद्राचा चतुर्थ वर्धापनदिन रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत १८ फेब्रुवारी रोजी वाचनालयाच्या सभागृहात प्रथमेश लघाटेच्याच मुलाखतीने साजरा करणार आहे. रत्नागिरीत प्रा. डॉ. निधी पटवर्धन प्रथमेशशी संवाद साधतील. दोन्ही मुक्तसंध्या कार्यक्रमांना रसिकांना विनामूल्य प्रवेश दिला जाईल. रसिकांनी आपापल्या सोयीच्या ठिकाणी कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन चतुरंग, अभिरुची आणि नगर वाचनालय या तिन्ही संस्थांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:07 PM 17-Feb-21