रत्नागिरी : मिऱ्या (रत्नागिरी) ते नागपूर महामार्गावरील हातखंबा गावापर्यंतची अनधिकृत बांधकामे या आठवड्यात हटविली जाणार आहेत. आवश्यकता भासल्यास पोलीस बंदोबस्तही ठेवला जाणार आहे, अशी माहिती रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेले काही महिने रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील मिऱ्या ते नागपूर महामार्गाच्या आजूबाजूला अनाधिकृत बांधकामे काही लोकांनी केली आहेत. कुवारबाव, खेडशी या रत्नागिरीच्या उपनगरांमधील रस्त्यावर अनेक दुकाने उभी राहिली आहेत. त्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. साळवी स्टॉप ते कोकण नगरच्या आतील रस्त्यावर दोन्ही बाजूला तब्बल १६० अनधिकृत बांधकामे असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला पत्र्याची खोकी घालण्यात आली आहेत. साळवी स्टॉप ते खेडशीपर्यंतही अशी पक्क्या विटांची, चिऱ्याची अनाधिकृत बांधकामे रस्त्याच्या बाजूला केलेली दिसतात. ही बांधकामे तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पोलीस बंदोबस्त आवश्यक होता. जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्याबाबत पत्र पाठवून महसूल प्रशासनाने तशी मागणी केली होती. त्यानुसार येत्या ६ आणि ७ मार्च रोजी पोलीस बंदोबस्तात ही अनधिकृत बांधकामे तोडली जाणार आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:01 PM 02-Mar-21