चिपळूण : सार्वजनिक आरोग्य विभागामधील क व ड या पदांच्या भरतीसाठी २८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी परीक्षार्थी करीत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागातील क व ड या पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेला परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे सदरचा पेपर व्हॉटस्अॅप, सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पसरल्यामुळे पारदर्शक परीक्षा घेतल्या जातील, अशा म्हणणाऱ्या कंपनीचे पितळ उघडे पडले आहे. अशा बोगस पद्धतीने परीक्षा घेतल्यामुळे गेली दोन तीन वर्षे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या भरतीबाबत मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे. ज्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे ती कंपनी यापूर्वी काळ्या यादीत टाकलेली आहे. त्याच कंपनीला पुन्हा काम दिल्यामुळे हा सर्व सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे राज्यातील लाखो उमेदवारांचे नुकसान होणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत जातीने लक्ष घालून भरती परीक्षा तत्काळ रद्द करावी व यापुढील या परीक्षा एमपीएससी अथवा आरोग्य विभागामार्फत घेतली जावी, अशी मागणी उमेदवारांमधून करण्यात येत आहे
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:17 PM 04-Mar-21