मुंबई : विधानसभा महासंग्रामासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी पार पडल्यानंतर महायुतीकडून आज संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. महायुतीच्या पत्रकार परिषदेसाठी शिवसेना आणि भाजपमधील दिग्गज नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महायुती प्रचंड मतांनी विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर त्यांनी बंडखोरांना थेट इशारा दिला. त्यांनी बंडखोरांना महायुतीत कोणतेही स्थान नसल्याचे सांगितले. दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून न ठेवता त्यांना शेतात पाणी देणार असल्याचे ते म्हणाले. महायुतीमध्ये भाजप १५० शिवसेना १२४ तर मित्रपक्ष १४ जागांवर लढत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काही मित्रपक्ष भाजपच्या चिन्हावर तर काही त्यांच्या चिन्हावर लढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
