रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी दि. ४ मार्च रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कोमसापच्या केंद्रीय कार्याध्यक्षांकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. श्री. परांजपे यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे की, मधुभाई कर्णिक यांनी विश्वासाने अनेक जबाबदाऱ्या माझ्यावर दिल्या आणि मी त्या पूर्ण केल्या. तन, मन आणि धन अर्पून कोमसापच्या माध्यमातून आजपर्यंत यथाशक्ती मातृभाषेची सेवा केली. मात्र यापुढे एकाच वेळी अनेक अवधाने सांभाळणे प्रकृतीच्या कारणास्तव शक्य होणार नसल्याने मी माझ्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. आजपर्यंत केंद्रीय कार्यवाह, केंद्रीय युवाशक्ती प्रमुख आणि रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून मला कोमसाप परिवाराकडून सर्वांनी उत्तम सहकार्य दिले. वरिष्ठांनी आशीर्वाद दिले, मार्गदर्शन केले. या सर्वांचा मी ॠणी आहे. कोमसाप आणि मराठी भाषेवर माझे प्रेम सदैव होते आणि कायम असेल. आपला राजीनामा मंजूर करावा, असे श्री. परांजपे यांनी पत्रात म्हटले आहे. पत्राची प्रत त्यांनी केंद्रीय अध्यक्ष प्रा. अशोक ठाकूर, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे आणि शशिकांत तिरोडकर यांनी पाठवली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:09 AM 05-Mar-21