नवी दिल्ली : भारत अधिक काळ शस्त्रांस्त्रांचा आयातदार देश राहणार नाही. आम्ही संरक्षण क्षेत्रात सूूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहोत. जर आम्ही आयातदार देश राहिलो तर महाशक्ती बनण्यात अडचणी येतील, असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, देशाच्या संरक्षण उद्योगात खासगी उद्योगांनी सक्रिय सहभाग घ्यावा. संरक्षण उद्योगाला 2025 पर्यंत 26 अब्ज डॉलरवर (1.8 लाख कोटी) नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. खासगी गुंतवणूक आणि नवीन संकल्पना स्वीकारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या उद्योगाबाबत अनेक प्रस्ताव आहेत. आयात, निर्यातीबाबत अनेक मुद्दे आहेत. निर्णय घेताना सतर्क राहावे लागते. नाही तर तुमच्यावर आरोप होऊ शकतात; मात्र मी यामुळे चिंतीत होत नाही. कोण काय आहे? हे देशातील जनतेला ठाऊक आहे. गुंतवणूकदारांनी यावे. आमचे दरवाजे खुले आहेत.