रत्नागिरी : प्लास्टिकमुक्तीच्या उपक्रमाअतंर्गत राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरीतर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी मोहिम आयोजित करण्यात आली होती. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कुडाळ या ठिकाणी तसेच रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावर साळवी स्टॉप ते हातखंबा व पाली ते आंबाघाट या भागात मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतंर्गत राष्ट्रीय महामार्गाच्या सुमारे सात पॅकेजस अंतर्गत २५० कर्मचारी/अधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतला तसेच कोटक महिंद्रा बँक यांनीही आपला कर्मचारी सहभाग नोंदविला. या अभियानांतर्गत ११ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत राष्ट्रीय महामार्ग-प्लॅस्टिक मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले होते. सदर मोहिमेमध्ये सुमारे ९७८ किलोग्रॅम प्लास्टीक संकलीत करण्यात आले व महामार्गावर उभारलेल्या विविध कलेक्शन सेंटर्सवर गोळा करण्यात आला आहे. या प्लास्टीकचा वापर राष्ट्रीय महामार्गावरील डांबरीकरणाच्या कामांमध्ये करण्यात येणार असून त्यामुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जामध्ये वाढीव टिकावूपणा येणार आहे. कार्यकारी अभियंता सलीम शेख यांनी नागरिकांना आवाहन केले आहे नागरिकांनी अशा प्रकारे प्लास्टीक कचरा संकलन केले असल्यास अथवा केल्यास पुनर्वापराकरिता महामार्गावरील संकलन केंद्रावर जमा करावे, या मोहिमेतंर्गत जनजागृती विद्यार्थी रॅली, विद्यार्थ्यांची घोषवाक्य व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच मोहिमेचे माहितीदर्शक फलक लावण्यात आले होते. दि. २ ऑक्टोबर २०१९ रोजी या विभागातील उप कार्यकारी अभियंता बी. ए. पाटील, उपविभागीय अभियंता एम.एम. मडकईकर, शाखा अभियंता वसंत टाकळे, सहायक अभियंता आरती कांबळे, कनिष्ठ अभियंता वृषाली दैवज्ञ, कनिष्ठ अभियंता नयना बनकर आदी अभियंते व कर्मचारी यांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होवून श्रमदान करुन अभियान यशस्वी केले.