मुंबई : संजय निरुपम यांनी वृक्षतोडी विरोधात गोरेगाव चेक नाका येथे आरे कॉलनीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना तिथे जाण्यापासून रोखले. यावेळी निरूपम यांनी शिवसेनेवर आरोप करत, शिवसेना मेट्रो कारशेड प्रकरणात दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. गोरेगाव मेट्रो कारशेड प्रकल्पातील झाडे तोडल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. वृक्ष तोडीचा विरोध करण्यासाठी आज गेलेल्या पर्यावरण प्रेमींची पालिसांनी धरपकड केली. आतापर्यंत २९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अनेक सेलिब्रेटींनीही वृक्षतोडीवर चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान आज काँग्रेसचे माजी खासदार संजय निरूपम यांनी या ठिकाणी येत आपला विरोध दर्शवला. मात्र पोलिसांनी त्यांना अटकाव केला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना निरूपम यांनी शिवसेना मेट्रो कारशेड प्रकरणात दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. पोलिस आरे कॉलनीत कलम 144 लागू करते, हे चुकीचे आहे. सरकार चालते ती लोकांच्या भावनावर, कोर्टानंही लोकांच्य भावना समजून घेतल्या पाहिजेत. सरकार मध्ये बसलेल्या लोकांनी संवेदनशीपणे लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. सरकार मुंबईकरासोबत सूडबुद्धीने वागत आहे, असे मत संजय निरुपम यांनी व्यक्त केले. यावेळी काँग्रेस पार्टी एसीमध्ये बसून हवा खात आहे, माझ्यासोबत कोण नसून मी नेहमी एकटा रस्त्यावर उतरून आंदोलन करतो, असा घरचा आहेर निरुपम यांनी काँग्रेसला दिला आहे.