रत्नागिरी : मतदानाच्या विविध कामांमध्ये मदत करणारे सहाय्य, मतदार चिठ्ठी वाटप, मतदानाच्या दिवशी केंद्रावर उपस्थित राहणारे आदी संलग्न कामे करतात. त्यांना आता ५ हजार ऐवजी ६ हजार मानधन दिले जाईल अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. याबाबत दिलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की या संदर्भातील एक शासन निर्णय आला आहे. मतदार याद्यांची विश्वसनीयता सुनिश्चित करण्यात प्रत्येक मतदान केंद्रात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (Booth Level Officer२) च्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाने ८ जुलै २०१५ च्या पत्रान्वये या बीएलओंचे मानधन ५००० रुपये ऐवजी ६००० रुपये देण्याबाबत निर्देश दिले होते. या अनुषंगाने २०१९-२० या वित्तीय वर्षापासून ५००० रुपये ऐवजी ६००० रुपये सुधारित मानधन देण्याचा निर्णय या शासन निर्णयाद्वारे घेण्यात आला आहे. त्यासोबतच बीएलओ यांना त्यांच्या निर्धारित मतदान क्षेत्रात घरोघरी जावून केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी आणखी १ हजार रुपये वार्षिक मानधन असणार आहे. शासनाचे उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य अ.ना.वळवी यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा शासन निर्णय आला आहे.
