म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता हस्तगत केल्यानंतर परिस्थिती चिघळली आहे. रविवारी यंगून भागात आंदोलकांनी एका चीनच्या फॅक्टरीला आग लावली. यानंतर म्यानमारच्या लष्कराने आंदोलकांवर बेछुट गोळीबार केला. यामध्ये 51 आंदोलकांचा जागीच मृत्यू झाला आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून आंदोलन सुरु आहे. यंगूनच्या गोळीबारात 51 जणांचा मृत्यू झाला असून वेगवेगळ्या शहरांमध्ये रविवारी 12 लोक ठार झाले आहेत. एका संघटनेनुसार म्यानमारमध्ये आतापर्यंत 125 हून अधिक आंदोलक मारले गेले आहेत. या गोळीबारातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता काही जाणकारांनी वर्तविली आहे. काही ठिकाणे अशी आहेत, जिथे मृतदेह पडून आहेत. तिकडे लक्षही दिले गेले नाहीय.म्यानमारमध्ये सुरु असलेल्या या रक्तरंजित खेळामुळे जगाला चिंतेत टाकले आहे. रविवारच्या घटनेनंतर ब्रिटिश सरकारने चिंता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांकडूनही म्यानमारच्या लष्कराने लोकांनी निवडून दिलेल्यांच्या हाती पुन्हा सत्ता सोपवावी असे आवाहन केले आहे.
म्यानमारमध्ये फेब्रुवारीमध्ये सत्ता उलथवण्यात आली होती. म्यानमारच्या लष्कराने देशावर ताबा घेतला होता तसेच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला बेदखल केले होते. आंग सान सू यांच्यासह मोठ्या नेत्यांना तुरुंगात डांबले आहे. यानंतर लोकांमध्ये सैन्याविरोधात उद्रेक पहायला मिळाला. लोक रस्त्यावर उतरले असून आंग सान सू यांना सोडण्याची मागणी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सैन्याने आक्रमक रुप घेत आंदोलन चिरडण्यासाठी आंदोलकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर विरोधात पोस्ट टाकल्यासदेखील कारवाई केली जात आहे. आतापर्यंत तिथे 2156 लोकांना अटक करण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:45 PM 15-Mar-21