कुडाळ : कुडाळ तालुक्यात सोमवारी परतीच्या पावसाने धुमशान घातले. कुडाळ शहरासह ग्रामीण भागात सोमवारी महानवमी दिवशी वाजत-गाजत पावसाचे आगमन झाले. या पावसाने विजयादशमी-दसर्यासाठी बाजारपेठेत दाखल झालेल्या झेंडूच्या फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर पिकलेले भातरोपे जमीनीला टेकली, कापणी केलेले भात भिजल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. दुपारी सतत दोन तास कोसळलेल्या या पावसाने सर्वांची त्रेधातिरपट उडाली. गेले काही दिवस पाऊस गायब होऊन कडक उन पडले होते.त्यामुळे पाऊस गेल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत होते. नवरात्रोत्सवात यंदा पाऊस पडला नसल्याने गरबा-दांडीया कार्यक्रम उत्साहात पार पडला. मात्र सोमवारी दुपारी अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यात वीज गडगडाटासह जोरदार पाऊस बरसला. या पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय दसरोत्सवानिमित्त बाजारपेठेत दाखल झालेल्या झेंडूच्या फुलांचेही मोठे नुकसान झाल्याने कमी किंमतीत त्याची विक्री करण्याची वेळ व्यापारी व शेतक-यांवर आली. छत्री, रेनकोट न घेता घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपट उडाली.
