रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकाही उमेदवाराने आपले नामनिर्देशन पत्र मागे न घेतल्याने, रत्नागिरीत सहा उमेदवार रिंगणात राहिले आहेत. मात्र, खरी लढत ही शिवसेना आमदार उदय सामंत व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व नगरसेवक असलेले सुदेश मयेकर यांच्यातच रंगणार आहे. रत्नागिरी मतदार संघात एकूण सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील अण्णासाहेब कारभारी निकम यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. त्यामुळे नामनिर्देशन पत्र वैध ठरलेले सहा उमेदवार रिंगणात होते. यातील किती उमेदवार शेवटपर्यंत रिंगणात राहतात व कितीजण माघार घेतात याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागून राहिले होते. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकाही उमेदवारांने आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले नाही. त्यामुळे अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर या सर्व उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी चिन्हांचे वाटप केले. शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांना पक्षाचे धनुष्यबाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुदेश मयेकर यांना घड्याळ, बहुजन समाज पार्टीचे राजेश सीताराम जाधव यांना हत्ती, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दामोदर शिवराम कांबळे यांना गॅस सिलेंडर, बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार बाळा कचरे यांना खाट तर अपक्ष उमेदवार संदीप यशवंत गावडे यांना शिट्टी ही निशाणी मिळाली आहे.