रत्नागिरी : जिल्ह्याच्या सागरी हद्दीत मलपी ट्रॉलर्सकडून घुसखोरी सुरू आहे. दररोज दोनशे ते चारशे नौका जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसून बिनदिक्कत मासेमारी करीत आहेत. वेगवान ट्रॉलर्सवर करताना रत्नागिरीच्या मत्स्य विभागाची यंत्रणा तोकडी पडत आहे. अद्ययावत यंत्रणेने सुसुज्ज असलेले ट्रॉलर्समुळे स्थानिक मच्छिमारांना हात हलवत माघारी परतावे लागत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात १ ऑगस्टपासून पारंपारीक मासेमारीला सुरूवात झाली. परंतु, मुसळधार पावसाने पहिल्याच महिन्यातील वीस दिवस उशिरा हंगाम सुरू झाला. पहिल्या जेमतेम एक आठवडा मासेमारी सातत्याने सुरू होती. यानंतर १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. सप्टेंबर महिन्याचा बराचसा कालावधी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी वाया गेला. यामुळे दोन महिन्यात काहीच दिवस नौका समुद्रात उतरवण्याची संधी मच्छिमारांना मिळाली. यातही अनिश्चित वातावरणाचा फटका मच्छिमारांना सहन करावा लागत आहे. अशातच आता मलपी बोटींची घुसखोरी सुरू झाल्याने मच्छिमारांसमोर नवीनच संकट निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांपासून मच्छिमारी नौकांना फार कमी रिपोर्ट लागत आहे. मच्छिमारांच्या जाळयातून सुरमई, पापलेट, मोडोसा, गेदर, बांगडे गायब झाले आहेत. टायनी देखील फार कमी प्रमाणात मिळत आहे. याची वेगवेगळी कारणे मच्छिमारांकडून देण्यात येत होती. अस्थिर वातावरणाने मासळी पळाल्याचे मच्छिमारांकडून बोलले जात होते. याशिवाय वाढलेल्या गर्मीने मासळी दूर गेल्याची चर्चादेखील सुरू होती. परंतु, कर्नाटक, गुजरात आदी ठिकाणच्या बोटींच्या घुसखोरीचा मोठा परिणाम स्थानिक मच्छिमारांच्या उत्पन्नावर झाल्याचे समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून मलपीतील शेकडो नौका जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करत असल्याचे दिसून आले आहे, दोनशे ते चारशे नौका येऊन मासेमारी करून माघारी जात असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. या नौका एकत्रितपणे मासेमारी करतात. काहीवेळा बारा वावाच्या बाहेर तर कधी बारा वावाच्या आत येऊन या नौकांकडून मासेमारी सुरू आहे. याबाबत मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. परंतु, मत्स्य विभागाची यंत्रणाच तोकडी असल्याने वेगवान ट्रॉलर्सवर कारवाई करण्यात मत्स्य विभागाला अपयश येत आहे. मलपी ट्रॉलर्समुळेच स्थानिक मच्छिमार नौकांना मिळणारा रिपोर्ट घसरल्याचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. बारा वावाच्या बाहेर ट्रीगर फिशची दहशत समुद्रात बारा वावाच्या बाहेर ट्रीगर फिशची दहशत सुरू झाली आहे. ट्रिगर फिशकडून मासळीवर हल्ला करण्यात येत असल्याने मासळी या ट्रिगर फिश पासून दूर पळत आहे. पर्ससिन नौकांना बारा वावाच्या बाहेर जाळयातट्रिगर फिश सापडू लागल्याने पर्ससिन मच्छिमार हैराण झाले आहेत.