वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस दलात उलथापालथ; ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या

0

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचमधील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना झालेली अटक, त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची करण्यात आलेली उचलबांगडी आणि पाठोपाठ परमबीर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टाकलेला लेटरबॉम्ब अशा स्फोटक घटनाक्रमानंतर मुंबई पोलीस दलात घाऊक बदल्या करून अनेकांना दणका देण्यात आला आहे. या बदल्यांत गुन्हे शाखेतील तब्बल ६५ अधिकाऱ्यांची अन्यत्र पाठवणी करण्यात आली असून त्यात निलंबित सचिन वाझे यांच्या सीआययु युनिटचे एपीआय रियाझुद्दीन काझी व प्रकाश होवाळ यांचीही बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या सीआययू पथकातील अधिकारी सचिन वाझे यांच्यामुळे संपूर्ण मुंबई पोलीस दल अडचणीत सापडल्यामुळे मंगळवारी निरीक्षक, सहायक निरिक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये गुन्हे शाखेच्या ६५ पोलिसांचा समावेश आहे. ॲंटिलिया स्फोटकं प्रकरण आणि त्यानंतर मनसुख हिरन यांची हत्या यामध्ये सचिन वाझे याच्यासह काही पोलिसांचा सहभाग आढळल्याने मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन झाली. मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यानंतर हेमंत नगराळे यांनी पोलीस दलात फेरबदल करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार मंगळवारी ८६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. सीआययू मधील सचिन वाझे यांचे सहकारी आणि एनआयएच्या चौकशीला सामोरे गेलेले एपीआय रियाझुद्दीन काझी यांची सशस्त्र दलात तर प्रकाश होवाळ यांची मलबार हिल पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेत जास्त कालावधी काढलेल्या अधिकाऱ्यांना हटविण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी सचिन वाझे प्रकरणामुळेच घाऊक बदल्या करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाशी काहीच संबंध नसतानाही बदलीचा फटका बसल्याने पोलिसांमध्ये प्रचंड नाराजी आहे. विशेष म्हणजे या बदल्या निवासस्थानापासून लांब ठिकाणी केल्यामुळे पोलिसांमध्ये असंतोष आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:56 AM 24-Mar-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here