कणकवली : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवलं. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुद्द राणेंनीच याची कबुली दिली असून अशा या जनाधार संपलेल्या राणेंच्या तिसऱ्या पराभवासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले आहे. शिवसेनेच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
नारायण राणेंवर टीका करताना विनायक राऊत म्हणाले की, ‘ राणे जिकडे जातील तिकडचा पक्ष परिवार बिघडविल्याखेरीज राहत नाहीत. शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान या पक्षानंतर ते आता भाजपमध्ये येत आहेत मात्र राणेंच्या या स्वभावाची कल्पना भाजप नेत्यांना असल्याने त्यांना अजूनही प्रवेश दिलेला नाही.
अप्पासाहेब गोगटे यांच्यानंतर अॅड. अजित गोगटे तसेच प्रमोद जठार यांनी कणकवली – देवगड मतदारसंघाची परंपरा जपली. आता ही परंपरा सतीश सावंत पुढे चालू ठेवतील. जनाधार संपलेल्या राणेंच्या तिसऱ्या पराभवासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे.’
कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. नारायण राणे यांचे अत्यंत निकटवर्ती सहकारी मानले जाणाऱ्या सतीश सावंत यांनी नुकताच स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला आहे.
नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यापासून शिवसेना आणि राणे यांच्यात वाद सुरु आहेत. राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेपासून तो वाद आणखी वाढला आहे. शिवसेना सोडल्यापासून राणे नेहमीच शिवसेनेवर टीका करताना दिसतात तर लोकसभा 2014ची निवडणूक असो, विधानसभा असो, वांद्रे पोटनिवडणूक असो की, 2019ची लोकसभा निवडणूक, शिवसेनेने नारायण राणे यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे.
