रत्नागिरी : कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. मी आणि उदय सामंत राजकीय प्रतिस्पर्धी होतो. मात्र महायुतीमुळे आता उदय सामंत विक्रमी मताधिक्याने विजयी होतीलच. मोठ्या मनाने त्यांना आम्ही स्वीकारल्यामुळे रत्नागिरीचा नक्कीच विकास होईल. खोटेनाटे सांगणा-यांचे बारा वाजतील आणि त्यांची दुकाने बंद होतील. रत्नागिरीत उद्योग विकास, शेतकरी, युवक आणि मच्छीमार, आंबा बागायतदारांचे प्रश्नीही सोडवायचे आहेत. उद्यापासून दहा दिवस भाजपचे ग्रामीण व शहरी भागांतील कार्यकर्ते नेटाने प्रचार करणार आहेत, असे माजी आमदार बाळ माने यांनी सांगितले.
रत्नागिरीत देवर्षीनगरात आज दुपारी भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनीही मनोगत व्यक्त केले. बाळ माने म्हणाले की, सामंत आणि मी प्रतिस्पर्धी होतो. आम्ही आपापल्या परीने पक्ष वाढवला. समाजाचे व्यापक हित लक्षात घेऊन काही वेळा मन मोठे ठेवावे लागते. रत्नागिरी विधानसभेचे सुजलाम चित्र पाहण्यासाठी आम्ही दोघे एकत्र आलो आहोत. दोघांकडेही कौशल्य, गुणवत्ता, क्षमता आहे. यातूनच रत्नागिरीचा विकास होईल व पश्चिेम महाराष्ट्रही मागे पडेल. सामंत विक्रमी मताधिक्याने विजयी होऊन त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल. कोणाला कसे व कुठे ठेवायचे, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. जयगड एमआयडीसी, युवकांना रोजगार, शेतकरी, मच्छीमार आदी प्रश्नम सोडवायचे आहेत. आम्ही विजयाकरिता सज्ज आहोत.
महायुतीचे उमेदवार आमदार उदय सामंत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपासून आम्ही एकत्रित दौरे केले. सहा महिने त्यांना बघत आहे. प्रतिस्पर्धी होतो तेव्हा कधीही वैयक्तिक पातळीवर राजकारण केले नाही. बाळासाहेबांनी संस्कारक्षम राजकारणाचा प्रयत्न केला. बाळासाहेबांनी माझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले आहेत. एकत्र आलो तर विकासकामे होतील. अनेकदा मी न बोललेले व बाळासाहेबांनी न बोललेले एकमेकांना सांगितले जायचे. ही वाईट प्रवृत्ती आता बंद होईल. बाळ माने आणि भाजपने मनाचा मोठेपणा दाखवून हा मेळावा घेतला हे मी विसरू शकत नाही. माझे नातेवाइकसुद्धा भाजपमध्ये आहेत. पण ते निष्ठावान आहेत, भाजपचे रक्त काय असते, ते पाहिले. तीन वेळा पराभव होऊनही माने यांनी कोणतीही तडजोड न करता संघटना उभी केली आहे.