महाराष्ट्र कॅरम असो.ची निवडणूक नुकतीच काशिनाथ धुरू हॉल, दादर, मुंबई येथे पार पडली. या निवडणुकीत रत्नागिरी जिल्हा कॅरम असो.चे अध्यक्ष प्रदीप भाटकर यांची महाराष्ट्र कॅरम असो.चे उपाध्यक्ष म्हणून तर रत्नागिरी जिल्हा माजी सचिव अजित सावंत याची खजिनदार म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
त्याचप्रमाणे शासकीय परिषदेवर चिपळूणचे राष्ट्रीय पंच श्साईप्रकाश कानिटकर यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र कॅरम असो.च्या महत्त्वाच्या अशा दोन पदांवर रत्नागिरी जिल्ह्याच्या दोघांची एकदम निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
महाराष्ट्र कॅरम असो.च्या अध्यक्षपदी पालघरचे उद्योजक व जेष्ठ कॅरमपटू जीतूभाई शहा तर कार्याध्यक्ष म्हणून पुण्याचे भारत देसाडला यांची निवड झाली आहे. मुंबईचे यतीन ठाकूर यांनी अरुण केदार यांचेकडून सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला.
गेल्या काही वर्षातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंच्या कॅरम मधील प्रगतीची दखल घेऊन तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे कॅरममधील काम पाहूनच रत्नागिरी जिल्हा कॅरम असो.ला हा बहुमान प्राप्त झाला आहे.
रत्नागिरी जिल्हा कॅरम असो.च्या कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केल्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यात कॅरमची एवढी प्रगती होत आहे आणि त्यामुळेच हा बहुमान आपल्याला मिळाल्याचे श्री प्रदीप भाटकर यांनी याबद्दल बोलताना सांगितले.
तसेच मिलिंद साप्ते, नितीन लिमये, राहुल बर्वे, सुरेन्द्रशेठ देसाई,मोहन हजारे,विवेक देसाई , इ.यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले.
