राजापूर : तालुक्यातील धाऊलवल्ली ग्रामपंचायतीला केंद्र शासनाचा पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण व नानाजी देशमुख राष्ट्रीय ग्रामीण गौरव पुरस्कार २०१९ जाहीर झाला आहे. दिल्ली येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात धाऊलवल्ली ग्रामपंचायतीला हा पुरस्कार देवून गौरविले जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्वाचा टप्पा असलेल्या ग्रामपंचायतीला बळकट करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविले जात असतात. तर या अनुषंगाने स्पर्धा घेवून पुरस्कार दिले जात असतात. याच अनुषंगाने केंद्रशासनातर्फे दरवर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण व नानाजी देशमुख राष्ट्रीय ग्रामीण गौरव पुरस्कार दिला जातो. प्रत्येक राज्यातील तीने ते चार ग्रामपंचायती या पुरस्कारासाठी निवडल्या जातात. या पुरस्कारासाठी सन २०१७-१८ या वर्षात मुल्यांकन होवून सन २०१९ मध्ये हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात केंद्रस्तरीय समितीची ग्रामपंचायतींची तपासणी होवून रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण तीन ग्रामपंचायती यासाठी निवडल्या गेल्या होत्या. मात्र धाऊलवल्ली ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान, ऑनलाईन कामकाज तसेच सर्वच स्तरावर बाजी मारत या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे.
बुधवार २३ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळयात धाऊलवल्ली ग्रामपंचायतीला हा पुरस्कार देवून गौरविला जाणार आहे. हा पुरस्कार मिळण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच मनोहर गणपत गुरव यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व्ही. ए. तळवडेकर व ग्रामस्थानी योगदान दिले असून त्यांचे शासन स्तरावर अभिनंदन होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या तालुका पंचायत समितीच्या कार्यक्रमात धाऊलवल्ली ग्रामपंचायतीला हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ग्र्रामविकास अधिकारी व्ही. ए. तळवडेकर यांचा गटविकास अधिकारी सागर पाटील यांनी अभिनंदन केले.
