स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आम्ही नेता मानत नाही. त्यांना भारतरत्न द्यायचा म्हणजे भगतसिंगाचा अपमान आहे असे वादग्रस्त वक्तव्य जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने केले आहे. कन्हैया कुमार हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नगरमधील उमेदवार भैरवनाथ वाकळे यांच्या प्रचारासाठी नगर येथे आला होता.
त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्याने सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळी भैरवनाथ वाकळे, शाहीर भगत, अनंत लोखंडे, सुभाष लांडे आदी यावेळी उपस्थित होते.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे नेते नाहीत, सावरकरांना भारतरत्न दायचा होता मग भगतसिंगांना का नाही? महाराष्ट्रामध्ये काळा पैसा, दलितांवर अत्याचार, शेतकरी आत्महत्या, शेती, बेरोजगारी असे प्रश्न असताना भाजप फक्त कलम 370 च्या मुद्द्यावर बोलत आहे. एक प्रकारे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार होत आहे. आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा हा महाराष्ट्र आहे पण या ठिकाणी कोणी विरोधक एकत्र येताना दिसत नाहीत. आता युवकांनी पुढे येऊन सक्षम पर्याय उभा केला पाहिजे त्यासाठी आम्ही चळवळ करत आहोत. आज पैशाच्या जोरावर सरकार काही करायला निघालेले आहे. विरोधी पक्षातील अनेक नेते पदांसाठी भुकेलेले आहेत ते विचार सोडून सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत, असा आरोपही त्याने यावेळी केला.
देशात विरोधकांचा एकत्र पर्याय उभा राहत नाही, हे दुर्दैव आहे. ईडी व अन्य तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. बिहारमध्ये 2015 ला जनतेने भाजप विरोधात मतदान केले, पण भाजपने तेथील मुख्यमंत्रीच पळवला. अशा स्थितीत राज्य घटना व तिने जनतेला दिलेले अधिकार वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असेही तो म्हणाला.
