नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : आयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उत्तर प्रदेशातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सोशल मीडियावर अफवा पसरू नयेत यासाठी लक्ष ठेवलं जात आहे. काशी, मथुरा यासह इतर धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली आणि उत्तरप्रदेश हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असून दोन्ही राज्यातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सर्व पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या 30 नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
दिपोत्सवाच्या आधी 20 ऑक्टोंबरपर्यंत अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था आयोध्येत पोहचेल. त्याचसोबत अर्धसैनिक बलांशिवाय पीएसीचे जवानही तैनात आहेत. दरम्यान 26 ऑक्टोबरला दीवाळीच्या पूर्वसंध्येला सहभागी होणाऱ्या विशिष्ट व्यक्तींच्या आगमनामुळे संभाव्य गर्दी पाहता आयोध्येकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.
दरम्यान, शस्त्रास्त्रांह हल्लेखोरांची घुसखोरी डोकेदुखी ठरू शकते. बांगलादेश, नेपाळकडून हल्लेखोर उत्तरप्रदेश आणि दिल्लीत घुसण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंजाब आणि काश्मीरमध्ये सुरक्षा कडक करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाकडून पठाणकोट, जम्मू काश्मीरसह सर्व एअरबेसवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. काही दिवसांपूर्वी अलर्ट जारी करण्यात आला होता. धोका टळल्यानंतर अलर्ट मागे घेण्यात आला होता.
