मुंबई : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सामने मुंबईत होणार की नाही याबाबत गेल्या काही दिवसांपासून शंका होती. याचं कारण म्हणजे वानखेडे स्टेडियममधील ग्राऊंड स्टाफमधील 10 जण आणि त्याव्यतिरिक्त इतर नियोजन टीममधील काही जण कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं सामने खेळवले जाणार की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या सर्व प्रश्नांना पूर्णविराम दिला आहे. मुंबईतील नियोजित आयपीएलचे सामने मुंबईतच होणार आहेत. 10 ते 25 एप्रिल दरम्यान मुंबईत 10 सामने होणार आहेत. हे सर्व सामने नियोजित वेळेनुसारच होतील अशी माहिती सौरव गांगुली यांनी दिली आहे. आयपीएलवर कोरोनाचं सावट तर आहेच. शिवाय दिवसेंदिवस मुंबईतील वाढणाऱ्या कोरोनाची संख्या हा चिंतेचा विषय आहे. दिल्ली कॅपिटल्स संघातील अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे विराट कोहलीच्या RCB संघातील सलामीवीर फलंदाजाला देखील कोरोना झाल्यानं कोहलीचं टेन्शन वाढलं आहे. वानखेडे स्टेडियममधील ग्राऊंड स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मुंबईत सामने होणार की नाही अशा चर्चा सुरू होत्या. मात्र बीसीसीआयकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मुंबईतील नियोजित सामन्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.