दारोदारी प्रचार करताना रस्ता आणि पाण्याच्या समस्या लोकांनी बोलून दाखवल्य. त्यामुळे १२ जिल्हा परिषद गट आणि ९४ ग्रामपंचायतींमध्ये लोकांना बदल हवा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरीचे उमेदवार सुदेश मयेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आज त्यांनी आपल्या प्रचाराविषयी माहिती दिली. ते म्हणाले, तालुक्यातील ३४५ बूथवर लोकांचे सहकार्य मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याचा निश्चय राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांनी केला आहे. खराब रस्त्यांमुळे विरोधक खड्ड्यात जाणार आहेत. गेल्या ५ वर्षांत आमदारांकडून भरीव काम झालेले नाही, असे कुमार शेट्ये यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, श्री. मयेकर यांनी आज रत्नागिरी शहरातून प्रचार फेरी काढली. त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.